पुसद शहरासाठी दिलासादायक निर्णय
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याने अतिक्रमण धारकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे..!
पुसद (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमण धारकांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड समोर आली असून, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अतिक्रमण धारकांना लवकरच “आखीव पत्रिका (नमुना ड)” मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून सुरू होती. या प्रक्रियेत जागेची मोजणी तसेच नगर रचना नियमावलीनुसार भूखंडांच्या अभिन्यासाला मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यानुसार पुसद शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांच्या भूखंडांचे मोजमाप करून अभिन्यास तयार करण्यात आले व ते पुणे येथील नगर रचना विभागाकडे सादर करण्यात आले होते.या प्रस्तावांपैकी शिवाजी वार्ड व नवल बाबा वार्ड या दोन वार्डांच्या अभिन्यासाला नगर रचना विभाग, पुणे यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीच्या आधारे संबंधित नागरिकांना आखीव पत्रिका देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. उर्वरित वार्डांबाबतही नियमानुसार कार्यवाही सुरू असून लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नगर परिषद निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उर्वरितवॉर्डांमधील प्रक्रिया देखील लवकर पूर्ण करण्यात येईल.”
या निर्णयामुळे पुसद शहरातील अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल विभागाचे आभार मानले. मंजुरी मिळालेल्या अभिन्यासातील लाभार्थी आता प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलासाठी पात्र ठरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
